Saturday, January 17, 2026

शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सर्वात प्रभावी माध्यम - मा.डॉ.राकेश अहिरे

शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सर्वात प्रभावी माध्यम - मा.डॉ.राकेश अहिरे

विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जानेवारी, २०२६ रोजी ८१ वा ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, मा.श्री.भूषण निकम, चेअरमन, कृषिभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन (महाराष्ट्र राज्य), मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ तसेच विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, डॉ.अनिता जिंतूरकर, श्री.अशोक निर्वळ, विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.राकेश अहिरे म्हणाले की, शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी त्यांना एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. शेतकऱ्यांना विविध कृषी व्यवसाय सुरू करून त्यातून अधिक आर्थिक नफा आणि त्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करून एकजुटीने काम करावे.

यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी द्वारे समृद्ध शेतकरी याविषयी मार्गदर्शन करताना मा.श्री.भूषण निकम यांनी सांगितले की, कोणत्याही शेतकरी बांधवांना कृषी उद्योग उभारणी करायची असेल तर तसे विचार आणि ज्ञान अंगीकृत करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण उद्योग करण्याचा विचार करणार नाही आणि काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत यशस्वी उद्योग उभारणी शक्य होत नाही. हे सर्व करायचे असेल तर शेतकरी बांधवांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्याद्वारे विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

यावेळी त्यांनी सांगितले कि, गावपातळीवरील १० शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. यासाठी ५ संचालक व ५ सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये कमीतकमी १ महिला संचालक असेल तर याचा फायदा होतो. तसेच एकापेक्षा जास्त गावे मिळून देखील शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली जाऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेसाठी ५ संचालक व ५ सदस्य यांचे जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड (मूळप्रत /स्कॅन), आधार कार्ड (मूळप्रत / स्कॅन), लाईट बिल / दोन महिन्यातील बैंक स्टेटमेंट, ४ फोटो (मुळप्रत किवा JPEG format), ७/१२ उतारा (झेरोक्स / pdf), शेतकरी असल्याचा दाखला, ऑफिस पत्त्यासाठी लाईट बिल, सोबत दिलेला फॉर्म भरून देणे, कंपनीसाठी नाव, संचालकांचे नाव, मोबाईल क्रमांक, ऑफिस पत्ता त्यासाठी लाईट बिल इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते. यातील बरेचशे कामे ही सीए आणि सीएस कडून करून घ्यावे लागतात. तसेच श्री.भूषण निकम म्हणाले की, केवळ कंपनी स्थापन करणे हा उद्देश असून नये. कंपनी स्थापन झाल्यास आपल्या परिसरातील सर्व मार्केटचा अभ्यास करून त्यानुसार उद्योग उभारणी करावी. तसेच कृषीमालाला परदेशात प्रचंड संधी असून शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन कृषीमालाच्या निर्यातीकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण तज्ज्ञांद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केले तर आभार डॉ.संजूला भावर आणि सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले.









****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...