Thursday, February 13, 2025

वडवाळी, ता.पैठण येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

वडवाळी, ता.पैठण येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या  विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत दि.१३.०२.२०२५ मौजे वडवाळी  येथे प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मण बडे यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ च्यां कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी शेतीतुन शाश्वत उत्पादन घेण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक शेतकरी बांधवांनी माती परिक्षण करावे व त्यानुसार पिक लागवडीचे नियोजन करावे. तसेच. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य अंतर आणि संतुलित खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये त्यांनी ४०-४५ दिवसांनी गळफांदी काढणे व ८०-९०  दिवसांनी शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. कपाशी वेचणीनंतर अनेक शेतकरी फरदड घेतात, ते घेऊ नका त्याऐवजी पऱ्हाटीची कुट्टी करा त्यातुन चांगले सेंद्रिय खतच मिळते परिणामी जमिनीचा पोत सुधारतो असे डॉ. दिप्ती पाटगांवकर यांनी सांगितले. 

तसेच कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) डॉ. संजुला भावर यांनी सांगितले की, मोसंबी बागेतील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन यांबद्दल मार्गदर्शन केले. बहुतांशी बागेचे वय वाढल्यामुळे उत्पादकता कमी होत आहे. अशा बागेमधील वाळलेल्या रोगट आडव्या तिडव्या वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्याची फळ काढणीनंतर छाटणी करुन झाडाचे पुनरज्जीवन केल्यास नवीन फुटीवर चांगली फळधारणा होण्यास मदत होते. छाटणी नंतर कट केलेल्या भागावर बोर्डोपेस्टचा लेप दिल्यास बुरशीजन्य रोगापासून झाडांचा बचाव देखील होतो.

यावेळी मंडळ अधिकारी श्री. आर.एस. सरोदे, कृषि सहाय्यक श्रीमती आर. डी. पवार, श्री वाय.एन. चौधरी वडवाळी गावचे सरपंच श्री किशोर काळे तसेच या विशेष कापूस प्रकल्पांचे तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम, श्री जयदेवसिंग सिंगल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. वडवाळी गावातील शेतकरी बांधव व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...